शुक्रवार, ५ जून, २०२०

कधी कधी आठवणींच्या रानवनात अनेक क्षण भेटतात. आठवणीत का होईना पुन्हा जगण्याची संधी फक्त काही अंतरावर असते पण...पण शेवटी राहूनच जाते !!!


जुने दिवस आठवता...

जुने दिवस आठवता, पुन्हा एकदा
का नाही चिवडले एकत्र ताटात घास
का नाही निजले आईच्या शांत कुशीत
का नाही ऐकले बाबांचे प्रेमळ कटू शब्द
का नाही जगले आजी-आजोबांसमवेत
का नाही लुटले बालमनाचे निरागस हास्य
का नाही रुसले भावा-बहिणींच्या प्रेमात
का नाही उधळले मैत्रीचे वात्रटपणातले रंग
का नाही स्मरले भांडणातले अबोल भाव
का नाही केले जवळ दुराव्यातल्या नात्यांना
का नाही विसरले निष्ठुर शत्रुत्वाचे आघात
का नाही आले जपता सोन्यासारखी माणसं
का नाही हरवले कधी काळजीच्या विश्वात
का नाही शोधले एकदा स्वतःला स्वतःत
का नाही रमले अंतर्मनाच्या सुख-दुःखात
का नाही न्याहाळले जखडलेल्या भावनांना
का नाही विस्कटले वेळीच वेदनादायी डाव
का नाही विचारले हरवलेल्या शब्दांना
का नाही केले उघड हळव्या आसवांना
का नाही कवटाळले छातीशी स्वमनाला
का नाही घेतले मिठीत भयभीत हृदयाला
का नाही आठवले आठवणींच्या कुपीला
का नाही वेचले राहून गेलेल्या क्षणांना  


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा

कधी कधी आपलंच मन आपल्याला खायला उठतं आणि यातून अनेकदा आपल्या हिंमतीचं खच्चीकरण होतं...


काळजाआडच्या सुया...



(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा

शब्दांचे छुपे वार सर्वात वाईट...घाव नि जखमा अदृश्य असल्या तरी अंतर्मनात खोलवर रुतून घुसमटत राहतात...

घुसमट...



(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा

 
क्षणभंगुर असतात काही गोष्टी, काही क्षण, काही आठवणी, काही प्रश्न नि काही उत्तरं... जीवन जगायचे तर काहीतरी तोडगा काढावा लागतो. क्षणभंगुर क्षणांना जगण्याच्या गणितात गुंफावं लागतं...!

क्षणभंगुर...

क्षणभंगुर असाव्यात वेदना
पण कोणत्या ?
जणू अभ्यासक्रमाबाहेरचा प्रश्न
एक दीर्घ श्वास घेऊन
स्वतःशीच केलेला...
नकळत येऊ घातलेल्या
की स्वतःच स्वीकारलेल्या
की अनुत्तरित राहिलेल्या
की प्रश्नात गुंतलेल्या
की कधी न जाणवलेल्या
की फक्त शंकेतल्या
की खरंच क्षणभंगुर ???
उत्तराखातर उभे ठाकलेले
नवे प्रश्नच प्रश्नावलीतले...
विलक्षण क्षणांची
क्षणात चाळणी करणारे...
क्षणभंगुर क्षणांच्या
असंख्य वेदनांचे घाव
गुंतलेल्या मनाशी खेळ करत
सळसळत्या भावनांत
खोल रुतून बसलेले
क्षणिक वाटणारे...
कधीतरी शोधावे लागते
अन् साधावे लागते गणित
रडत, कुथत हरवलेले
प्रश्न वेदनादायी उत्तरातले
निसटलेल्या भावनांतले
शेवटी फक्त जगण्यासाठी...


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा
 
 एका व्हाट्सअँप समूहाच्या उपक्रमावर मी दिलेला काव्यरूपी अभिप्राय...
 
सध्याचे ऑनलाईन तांत्रिक शिक्षण आणि शाळेतले पारंपरिक गुरु-शिष्य शिक्षण यांतील वास्तविकता आणि भविष्य यावर भाष्य करणारी कविता...!!!

शाळा बंद पडल्या तर...

शाळा बंद पडल्या तर लहान मुलांचं
शिक्षणाशिवाय काय भविष्य असणार
मौजमजेतल्या अभ्यासाविना त्यांना
इंटरनेटवरचं उपाशी आयुष्य भेटणार...

शाळा बंद पडल्या तर आपण सर्व
जणू अडाणीपणातलं जीवन जगणार
अंधश्रद्धेचं खायला उठेलेलं हे जग
ज्यात नैतिकतेचं भानच मुळी नसणार...

शाळा बंद पडल्या तर विद्यार्थी
शाळेचा शैक्षणिक अनुभव कसे घेणार
आता ऑनलाईन तंत्रज्ञानाशी त्यांचा
मेळ बसण्यास खरंच वाव मिळणार...

शाळा बंद पडल्या तर ज्ञानाच्या
कक्षा गुरुविना कशा रुंदावणार
शिक्षक जीवन मूल्ये सांगणारा
गुरु म्हणून शिष्य कसा घडवणार...

शाळा बंद पडल्या तर मानव
प्रगतीचा मार्ग कसा गाठणार
उद्योग, व्यवसायासारख्या क्षेत्रात
शेवटी समाज अज्ञानीच राहणार...

शाळा बंद पडल्या तर असंस्कारी
समाजाची रचना कशी बदलणार
फायदा, नुकसान, विज्ञान नि
अज्ञान वैचारिक कसे बरे होणार...

शाळा बंद पडल्या तर शैक्षणिक
पैशांचा बाजार कसा थांबवणार
तंत्रज्ञानाचा उपयोग विकासशील
पद्धतीतून खरंच साध्य करणार...

शाळा बंद पडल्या तर करोडो लोक
देशाचे सुजाण नागरिक कसे बनणार
माणुसकी, संवेदनशीलता, नियम
सगळेच बासनात गुंडाळले जाणार...

शाळा बंद पडल्या तर निरक्षरता
माणसात अराजकता फैलावणार
सहकार्य, आदरभाव या गुणांचे
मुलांमध्ये मूल्यांकन कोण करणार...

शाळा बंद पडल्या तर भकासतेच्या
वातावरणात मुलं एकाकी पडणार
अनेकविध कलागुणांच्या संपन्न
नौकेत विराजमान कसे होणार...

शाळा बंद पडल्या तर भावनांची
उघड गुलामी वाट्याला येणार
प्रेम, निरागसता, आदर, सन्मान
यांची स्वायत्तता हिरावली जाणार...

शाळा बंद पडल्या तर पालकांची
सततची घालमेल होत राहणार
मुलांच्या उज्वल भवितव्याची
एक वेगळीच चिंता सतावणार...

शाळा बंद पडल्या तर मैत्री नाते
कोवळ्या वयातले कसे फुलणार
अनोळखीत आपलेपणाचा भाव
विद्येविना कसा योग्य पारखणार...

शाळा बंद पडल्या तर उगाच भर
बेशिस्त समाजकंटकांची होणार
नसता सामाजिक बांधिलकीचे भान
व्यक्तिमत्व विकास कसा साधणार...

शाळा बंद पडल्या तर मुलांचा
उपद्रवी त्रास कुटुंब रोजच भोगणार
घरात आरामात, शिस्त मोडून
भांडणांचा उपहास करत बसणार...

शाळा बंद पडल्या तर मुलाच्या प्रगती
पुस्तकाविना शाबासकीला अर्थ नसणार
खडू, फळा, लळा नि जिव्हाळा यांत
न रमता शिकण्यात काय मजा उरणार...

शाळा बंद पडल्या तर गरीबाची मुलं
प्रगत शिक्षणाचे धडे कसे गिरवणार
विद्येचे हे माहेरघर चार भिंतींविना
अंती अपूर्णच का हो आता राहणार...


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा
सीमेवरच्या सैनिकांसाठी आणि अनेकांच्या सैनिक होण्याच्या स्वप्नासाठी...!!!

मी सैनिक झाले/झालो तर...



(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा

सर्व प्रेमळ, काळजी घेणाऱ्या मैत्र-मैत्रीण अशा परिवाराला समर्पित...!!!

मैत्रीचा रंग तुझ्याविना... 



(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा
विषय संकल्पना: रोहित सुर्यवंशी
शब्द संकलन: वर्षा शिदोरे 


"गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी..."




(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा
लघुकथा लेखन

भावनांची सजीव पणती...

दिव्या, भारती आणि सुमन या बालपणीच्या तीन मैत्रिणी एका पणतीसाठी भांडता आहेत हे पाहून त्यांच्या शेजारून जात असलेल्या जोशी काकूंनी त्यांना विचारले, “अगं मुलींनो, तुमच्या या मोठमोठ्या गोंगाटाचा त्या बिचाऱ्या पणतीला का म्हणून त्रास ?”

सुमन काहीशी नाराजीतच म्हणाली, “ काकू, खूप सुंदर व आकर्षक आहे खरं ही पणती पण बिचारी वगैरे काही नाही हं...! तिच्यासाठीच तर आम्ही तिघी भांडत आहोत. शेवटची उरलेली होती मग आम्ही तिघींनी ठरवले, की घरी घेऊन जाऊ आणि निर्णय घेऊ, ही कुणाकडे राहील याचा...”

“परंतु गेले दोन तास झाले आमचं काही ठरतच नाहीये. आम्हाला सर्वांना ती हवीये”, दिव्या सुमनला मधेच थांबवून म्हणाली.

“आणि काकू, आम्ही सगळ्या बालमैत्रिणींनी मिळून ही सुंदर पणती अकबर चाचाकडून खरेदी केली आहे. आता तिची विभागणी तिघींमध्ये कशी करणार तो प्रश्न आहे..”, काकूंचा प्रश्नार्थक चेहरा पाहून भारती म्हणाली.

“तुम्ही गेले दोन तास पणतीसाठी भांडण्यात घालवले...?”, जोशी काकूंनी आश्चर्याने विचारले.

“नाही काकू. आम्ही आधी दीड मस्त खेळ खेळलो. खूप मजा केली. पण आता थकलो म्हणून तेवढ्या वेळात पणतीचा वाटणी करू म्हटलं !”, काहीसे हसत आणि निर्वाणीच्या स्वरात भारतीने सांगितले.

“अच्छा...तुमचा संवाद नि भांडण तसे गंभीर आहे. पण मला आधी एक सांगा पणती निर्जीव की सजीव..?”, काकू विचारत्या झाल्या.

“कदाचित निर्जीव असावी का...? कारण आम्ही शिकलो आहोत ना शाळेत, सजीव व निर्जीव म्हणजे काय ते. हो ना गं दिव्या ?”, सुमनने दिव्याला प्रश्न केला.

“हो. सुमन तू बरोबर बोलते आहेस. जसे आपण सगळे सजीव आहोत. आपल्यात प्राण आहेत, हालचाल करतो, एक जीव आहोत. असा या पणतीत तर एकही गुणधर्म नाही. शिवाय वस्तू तर निर्जीवच असतात. आपल्या विज्ञानाच्या सदाफुले बाईंनी शिकवलेला सजीव-निर्जीव धडा मला चांगलाच आठवतोय...”, सुमनच्या मताला दुजोरा देत दिव्याने स्पष्टीकरण दिले.

“अम्म्म... निर्जीव पण हो...ती आपल्याला खूप काही शिकवते त्यामुळे सजीव...”, काहीशी गोंधळून गेलेली दिव्या म्हणाली.

“हो ना... आणि एकदा विशाल दादा म्हणाला होता...
मिटवून अंतर्मनातला अंधकार
प्रवास तिमिरातुनी तेजाकडे...
पेटवून आशेची पणती ज्योत
जाऊ नव्या आत्मविश्वासाकडे...”
दादाच्या या ओळी आठवून सुमन म्हणाली.

“वा...हुशार आहात तुम्ही सर्वच बालसवंगड्या ! बरं... एक काय ते अखेरचं उत्तर...?”, जोशी काकू मिश्किल हसत म्हणाल्या.

“सजीवच असली पाहिजे. कारण जिच्यामुळे आपल्याला भावना कळतात आणि जिच्यासाठी आम्ही भांडलोही मग ती निर्जीव कशी असेल...? तिच्यात लपलेल्या अदृश्य भावना असल्या तरी तिच्याविषयी आपल्या भावना जोडलेल्या आहेतच. आता समजलं. काकू, तुम्ही मघाशी का म्हणाल्या बिचारी पणती असं !”, एवढा वेळ शांत असलेली भारती काकूंकडे पाहून उद्गारली.

“बरोबर...! फक्त आपण शिकलेले पुस्तकी विज्ञानी ज्ञानच सजीव-निर्जीव गुणधर्ण ठरवत नाही. भावनाही बोलक्या असतात. कधी आपल्या तर कधी वस्तूंच्या. आपल्या घरातल्या वस्तू जसे टेलिव्हिजन, फोटोप्रेम, स्वयंपाकघरातल्या वस्तू, आपले कपडे इत्यादी वस्तू निर्जीव असल्या तरी त्यांचे आणि आपल्यातले भावनिक नाते दुसरा कोणी समजू शकत नाही. ‘अनुभवाचे भावुक, भावनिक बोल’ आता तुम्ही शिकलात. मग काय ठरलं पणती कुणाकडे बरं राहणार ?”, काकूंनी उत्साहाने विचारले.

“आम्ही सगळ्या मिळूनच तिला प्रेमाने जपू, तिचा आळीपाळीने योग्य वापर करू, तिला स्वच्छ ठेऊ, कधी वेगळ्या रंगांनी सजवू पण पुन्हा कधीच भांडणार नाही काकू...”’ तिघी जणू एकसुरात आनंदाने किंचाळल्याच.

जोशी काकू खाली ठेवलेल्या हातातल्या भाजीपाल्याच्या पिशव्या उचलून त्यांच्या घरात शिरल्या. तशा दिव्या, भारती आणि सुमन पुन्हा खेळण्यात दंग झाल्या.


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा
लेख लेखन  

सौंदर्य चारित्र्य

“बाह्य सौंदर्याची जरी खाण
विचारांतून हवा साजेसा मान
मनाला पटणारा आत्मविश्वास
मग आपोआप पचतो अपमान”

               खरं पाहिलं तर बाह्यरूपी सौंदर्य महत्वाचं वाटतं अनेकांना आणि भुरळही घालतं अनेकदा. ते कधी उघड नसेल व्यक्त केलं जात पण मनात कुठेतरी दडलेलं असतं. कधी आपल्याच वागण्या-बोलण्यातून जाणवतं तर कधी इतरांच्या नजरेतून. मग कोणतं सौंदर्य महत्वाचं मानावं-मनाचं जे हृदयाला साद घालतं ते की चेहऱ्यावरचं जे अगदीच असतं उघड....कसं बरं ठरवणार ?

              तसेच, सौंदर्य म्हटलं की ‘स्त्री’ असं जणू त्रिकालाबाधित सत्यच ! त्यामुळे खरी मानसिकता दडून राहते. ती कालांतराने समोर येतेही. कुणाच्या हव्यासापोटी गुन्हे, अपराध घडतात तर कुणाच्या अविवेकी, गंज लागलेल्या बुद्धीच्या अतिरेकामुळे बदलाचा भयानक काळ दिसतो. अशा मानसिकतेला बदलणं जितकं सोपं तितकंच अवघड.

“स्त्रीला वाटायला लागली आहे
अस्तित्वासाठी सौंदर्याची शिक्षा
बदलावी आता विकृत मानसिकता
वेळोवेळी का द्यावी लागे परीक्षा”

             क्रूरपणे शरीर जाळणाऱ्या नराधमास ‘ती’चं कपड्यांवरून ठरणारं सौंदर्य महत्वाचं वाटलं नि तो आकर्षित झाला असा उघड न्याय दिला तर त्याच्या मनातल्या विकृत विचारांशी आणि तिच्या अस्तित्वाशी अन्यायच ! अशा मानसिकतेतून नकारात्मक व्यक्तिमत्व वैचारिक जगासमोर येत असताना ‘सौंदर्य’सुद्धा नकारात्मक होईल की काय अशी शंका घेण्यास जागा उरते. त्यामुळे हे चित्र पालटले पाहिजे. तेच हितकारी ठरेल.

             व्यक्तिमत्व पेहरावाने खुलतं खरंच आहे हे ! पण पेहरावही आपल्या दिसण्या-वागण्याला साजेसा असावा लागतो, हे नव्यानं सांगायला नको.... ते म्हणतात ना....अंगापेक्षा बोंगा नसावा मोठा ! परंतु अंतर्मन शुद्ध असेल तर सभोवतालच्या वातावरणासोबत आपलं व्यक्तिमत्वही खुलतं. मनापेक्षा सुंदर, निष्पाप आणि शुद्ध दागिना शोधूनही सापडणे नाही ! आपल्या मनावरचा चांगल्या-वाईट विचारांचा पगडा खूप मोठा आणि विस्तृत आहे तसा. मनाला पटतं की जनाला हे तेवढं आत्मविश्वासाने आपल्यासाठी आपण ठरवायचं. कारण विचारांचं शस्र असो वा शास्त्र, नसेल पटत तर वापरयाचं नाही आणि झुगारून पुढे जायचं. फक्त आपला निर्णयही योग्य असू शकतो हा विश्वास कायम असणं महत्वाचं !

             आपल्यासाठी आपलं अथवा दुसऱ्याचं कोणतं सौंदर्य का म्हणून महत्वाचं ते आपल्याला जाणता आलं पाहिजे. कुणी कितीही गाथा गायली, ब्रह्मज्ञान सांगितलं तरीही आपल्या विचारांचं योग्य-अयोग्य असणं शेवटी आपल्या मनाला लवकर पटतं. विवेकी निर्णयक्षमता प्रत्येकात असते. आपला कोणता गुण कुठे आणि केव्हा वापरावा याचं ज्ञानही यातूनच मिळतं. 'चारित्र्य' नावाचा ग्रंथ याच विचारांतून घडतो, फुलतो....!!!

“चारित्र्याला गालबोट लावणारा
सौंदर्य गुण नसावा निव्वळ देखावा
विश्वासाचं सुंदर बीज खुलवणारा
अंतर्मनाचा त्यात साथीदार हेरावा ”


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा
अलक (अति लघु कथा)

कर्तव्य काळजी

आई: प्रिया, आज इतकी का सुकून गेली आहेस तू..?
प्रिया: अगं आई, माझे पीरिअड्स आहेत.
आई: अगं, मग थोडा आराम कर बरे वाटेल.
प्रिया: हो आई पण उद्यासाठी सॅनिटरी पॅड्ससुद्धा संपले आहेत. माझी इच्छा नाही बाहेर जायची.
बाबा: मी घेऊन येतो. मला नाव सांगा. आलोच मी घेऊन !
प्रिया: बाबा, तू आणणार...?
बाबा: हो मग ! अगं, मी तुझा बाबा आहे बेटा. अशावेळी तुमची काळजी कशी घ्यावी याची संपूर्ण माहिती मी वाचली आहे. काळजी नसावी. आणि हे तर माझे कर्तव्यच !
(महिलांच्या शारीरिक समस्या आणि उपाय याबद्दल माहिती ठेवणे हे पुरुषांनी आपल्या परिवाराच्या काळजीचा कर्तव्यभाग समजावा हे यातून साध्य होते.)


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा
५ जून...जागतिक पर्यावरण दिन विशेष ललित लेख

पर्यावरण रक्षक...

                    परोपकाराच्या नावाखाली कित्येकदा लुटले स्वतःचेच अस्तित्व. कधी नकळत, कधी निःस्वार्थाच्या खोट्या मथळ्यांखाली. विकास नि प्रगती नांदता घरी जणू पर्यावरणाची रयाच गेली ! निसर्गाच्या शानशौकतीला इतके छेद केले की आज रक्षक भक्षक झालाय असे म्हणायला निर्विवाद दाद मिळेल.

                    कुठे ती नैसर्गिक हिरवळ नि आता दारातल्या बागेतली कृत्रिम ‘लॉन’. आरोग्यदायी जीवनासाठी वैज्ञानिक उपाय करता करता नैसर्गिक जंगले, पर्वत, धरतीचे रूप, वृक्ष नवलाई, नदी, नाले, समुद्र इत्यादींनाच जणू महामारीने झपाटले आहे.

                      मानवनिर्मित प्रदूषणाची काय ती भलीमोठी जंगले, वादळे, प्लास्टिक पॅच, महासागरातले जाळे, वितळलेल्या बर्फाचे उघड दालन, अग्नीच्या ज्वाला ज्यांच्यासमोर मनुष्याच्या प्रगतीचे पुराणही फिके ! हवामान बदलांचे हे जाळे ऋतुमानही हिरावून घेत आहे. पण पाहायला गेले तर आभासी जगतातले निसर्ग माणसाचे खरे जीवन झालेय. खुल्या आकाशाखाली त्याचे घर आहे पण खुले मन नाही, त्याचे दुःख उघड आहे पण सुख नाही, त्याच्या ठायी चिंता आहे पण आनंदी जीवन नाही.
                                                                                                                                              
                      तेव्हा पर्यावरणाच्या ह्रासाचे कारण होण्यापेक्षा त्याचे रक्षक व्हावे, त्याचे भक्षक होण्यापेक्षा त्याचे संवर्धनकर्ते व्हावे. प्रदूषणाची मात्रा कमी करण्याचा प्रयत्न करावा, वृक्षारोपण करावे, प्रत्येकाने सुरुवात स्वतःपासुन करावी, उजाड धरतीला शाश्वत भविष्यासाठी, पिढीसाठी सुशोभित करावे.

“व्हावे रक्षक, नको उगा भक्षक
स्वतःच्या उपजीविकेचा सन्मान
सर्वांना खरंच हवी असल्यास
निरोगी पर्यावरणाची साथ छान”


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 
नाशिक, नाशिक जिल्हा

सोमवार, २७ जानेवारी, २०२०

एका मुलीच्या मनातलं...

बाबा काहीतरी सांगायचंय...

तुमच्या स्वप्नाळू परीला कोणताच नाही आहे त्रास
मानसन्मानाचा विनाकारण नाही कोणताच घाट
जीवनाच्या चांगल्या, वाईट आशांवर निर्विवाद
तुमचा प्रत्येक शब्द जणू अनमोल आशीर्वाद
तुमच्या कष्टाचं ऋण मुळीच नाही फेडायचं
ते शक्य नाही सगळं आयुष्य जरी मी झुरलं
ओरडण्यात तुमच्या दिसत असते काळजी
आईच्या कुरकुरण्याविरुद्ध मिळते साथ तुमची
दुर्लक्ष कधी तुमच्याकडे माझ्याच व्यापात होते
आठवणीने आठवण फक्त तुम्हालाच तेव्हा येते
पण बाबा मला काहीतरी सांगायचंय...बोलायचंय
सर्वात आवडता हिरो फक्त तुम्हीच कायम राहणार
आतापर्यंतच्या प्रत्येक निर्णयात फक्त होकार भरलात
पुढेही अशीच मिळेल होकाराची साथ, एवढंच हवं
स्वातंत्र्य बोलायचं, निवडीचं दिलंत तर काळजी सोडा
परीला तुमच्या स्वतःच्या हातात सत्ता तर देऊन पाहा
आजपर्यंत सगळं सांभाळलं तुमच्या खांद्याला खांदा देऊन
आता फक्त पाठीवर हात ठेऊन धाव म्हणून तर पाहा
तुमच्या कष्टाला जागण्याची एक संधी तर देऊन पाहा
मुलांपेक्षा मुलीला जपणारा तुमच्यासारखा माझा बाबा
म्हणजे नक्कीच, सर्वात नशीबवान आहे रे मी बाबा
कोणाच्याच विरोधाला तुम्ही कधीच नाही पडला बळी
मुलीच्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच राहिलात उभे
अशीच साथ आयुष्यभर मिळत राहो, एकच मागणी... 


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

शनिवार, २५ जानेवारी, २०२०

२६ जानेवारी: प्रजासत्ताक दिन 

विविधतेने नटलेल्या मनांत
भारतभूमीच्या वारसाचा ठेवा
सगळेच एकतेत नटलेले
प्रतीक शांततेचे जपलेले

सर्वधर्मसमभाव ब्रीद देशा 
शिकवण माणसास अशी 
स्वातंत्र्य, समता, बंधुता
शान भारतीय संविधानाची 

हक्कास पुरेपूर कर्तव्याची
जोड आपुलकीच्या भावनेची
मान सर्वास असा समानतेचा
तिरंगा बहुमान या देशाचा

भारतवीरांच्या श्वासाश्वासातून
देशप्रेमाचा वाहतो प्रेमळ झरा
एकदुसऱ्याचे करूया संरक्षण
ध्यास महान देशाच्या प्रतिष्ठेचा

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

 माझ्या ‘स्मितरहस्य’ या काव्यसंग्रहाच्या मनोगताचे (मलबर- पुस्तकाचे शेवटचे पृष्ठ) सरांनी आपल्या आवाजात खूप छान रेकॉर्डिंग केले आहे. त्यास सरांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधील अनेक मोठ्या हस्तींचा अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला. सरांनी सर्व वृत्तांत सविस्तर ऐकवला त्याबद्दल सरांचे आभार. मनोगत अनेकांना प्रेरणादायी आणि आशादायी वाटले, अनेकांनी त्यातील भावार्थ समजून घेतले. त्यासाठी मी अतिशय ऋणी आहे.

माझे मनोगत सरांना अतिशय भावले आणि त्यांनी माझ्या कार्याबद्दल कौतुकाने मला हे ’सरप्राइस’ दिले त्याबद्दल लेखक,कवी राहुल गुरव यांचे खूप खूप आभार...!

आपली,
लेखिका,कवयित्री वर्षा शिदोरे


माझी कविता “अंत मनाजोगता रंगवणारा” रेडिओ एफएम १०७.८ पुणेरी आवाज वर...आरजे कैलास...
धन्यवाद..!

मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

विसरुनी कटुतेचे कडवे घोट
शब्दात तिळगुळाचा गोडवा
साठवावा सदैव हृदयात....
उंच उंच पतंग संगे नातीबंध
अखंड झेपावा आयुष्याचा
जगावा
सोहळा सुखाचा....

मकरसंक्रांतीच्या अनेक शुभेच्छा....!!!

(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

मायेची उब...
 

शनिवार, ११ जानेवारी, २०२०

युवा विश्वकर्ता....
 
युवा भावी विश्वकर्ता
वेध समग्र कयास
क्रांती ब्रीद परिवर्तन
हित शाश्वत विकास

जागर विचारांचा मनी
संकलसिध्दीची प्रेरणा
सन्मानाचा ध्यास नवा
विवेकानंद उद्याचा 

भविष्याचा विचारी शासक
लक्ष्यवेधी माणूस घडावा
समाधानी त्यागी उपजावा 
अमूल्य ठेवा जपावा 

सर्वांना राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा...!

(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

शौर्यवंत कीर्तिवंत राज्ञी...

महानतेचं स्मरण
जिजाऊ सम्राज्ञी माता
शौर्य दिव्य मूर्तिकार
सन्मानाचा खरा त्राता

महतीचा अविष्कार
लढवैय्या शूर नारा
वीरता थोर महान
कर्तृत्व विराट बाणा

मानापमान गिळला
तिलांजली संसाराला
तेववली स्वपताका
जनजग सुखावला

विराज्ञी दमणकारी
गुलामीपासूनि मुक्ती
स्वराज्याचा पाया उभा
रचिली अभेद्य कीर्ती

महा आदर विश्वात
लोकप्रिय व्यक्तिमत्व
घराघरात नांदतं
प्रेरणादायी माहात्म्य

मौल्यवान दिला ठेवा
दौलत डोलती शान
स्तुत्य शिवबा नि संभा
भावी अभिमानी मान 


राजमाता जिजाऊ जन्मोत्सव....१२ जानेवारी
(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे
स्पर्शाचं गाणं... 



मंगळवार, ७ जानेवारी, २०२०



To Everyone, Writers and Writers to be.....



Dedicated to my best, cutest and loving Niece आयरा....
Memories...१० डिसेंबर २०१८-१९

पहिला स्पर्श...
 




Language Services Bureau निबंध लेखन स्पर्था २०१९ मराठी
तिसऱ्या (पदवीधर/पदव्युत्तर व इतर गट) गटात द्वितीय बक्षीस 




'हवामान बदल' या समस्येवर काम करणाऱ्या तरुणांच्या कार्याबाबत तुमचे विचार (फ्राइडेस फॉर फ्युचर /ग्रेटा थनबर्ग)

"हवामान बदलांचा वेध नवा पर्यावरणाचा विडा
जीवनदायी आरोग्यसंपदेचा ध्यास बाळगूया वेडा"

जसजसं जग मानवाच्या कवेत येत चाललं तसतसं पर्यावणाचं रूप अधिक गंभीर, उद्रेकी होऊन जीवनाचा प्रश्न अधिक जटिल व्हायला सुरुवात झाली. 'वसुधैव कुटुम्बकम्' अशी संस्कृती असलेले आपले विचार आपल्याच अमानवी कृत्यांमुळे बळी चढताना दिसत आहेत. ज्यामुळे आपले तसेच आपल्या पुढील भविष्याचे जीवन आपणच दूषित करत आहोत. याचा परिणाम म्हणून अनेकार्थाने आपल्या आरोग्याच्या घातक समस्यांना वाचा फोडताना दिसत आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी तिचा योग्य मार्गांनी वेध घेणे जास्त जरुरी होऊन बसले आहे. जाणिवांची जाण योग्य वेळी होते तेव्हा सुरुवात ही करायलाच हवी, हा संघर्षाचा अचूक मार्ग चोखणे काळाची गरज बनली आहे. 'हवामान बदल' हा कळीचा मुद्दा ठरत असतांना प्लास्टिकमुक्त देश, स्वच्छता अभियान या अशा चळवळींनी आपला गाडा योग्य मार्गांनी हाकायला विविध देशांनी सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या सुकर पर्यायांनी अशी सकारात्मक वाटचाल खऱ्या अर्थाने चालू झाली आहे. सध्या गाजत असलेल्या हवामान बदलांच्या समस्यांना एक दूरदृष्टी मिळत आहे.

युएनच्या हवामान परिषदा, पर्यावरण अभियान, कॉप परिषदा, पॅरिस कायदा, चर्चासत्रे तसेच देशांतर्गत आयोग, चळवळी, समित्या आणि यांचे अहवाल यांमुळे हवामानाची बिघडत चाललेली दुर्दशा डोळे उघड करायला देशवासियांना मदतगीर ठरत आहे. त्यामुळे आज जगात कुठे नाहक हिमवृष्टी, बर्फ वितळण्याने गैरसोय, आपत्ती अशा हवामान बदलांमुळे होणाऱ्या समस्या का आणि कशा उद्भवत आहेत याची प्रचिती देण्याचे महत्वाचे काम त्या करतात. आपले जीवन नि भविष्य धोक्यात आहे हेच मुळात लक्षात येणे माणसात अजून जाणतेपणाची जाण आहे हे दर्शवते. लढाई मुश्किल असली तरी नामूमकिन नाही हे प्रेरणादायी आहे.

हवामान बदल ही समस्या सोडवणे नेटाने लढा देऊन आपल्या विचारांत परिवर्तन करून, समाजभान जपून आणि सुरुवात स्वतःपासून करण्याने साध्य होणार आहे. याचेच समाजभान ठेऊन 'शाश्वत हवामान/आरोग्य' यावर सखोल भाष्य करणाऱ्या अनेक पर्यावरणवादी, कार्यकर्ते या आणि अशा वर्गांमध्ये तरुण कार्यकर्त्यांचा समावेश आज वाढतो आहे. उद्याचं जग गाजवणारी, जगवणारी तरुण पिढी प्राधान्याने कचरता 'माझ्या नि माझ्या येणाऱ्या पिढीच्या भविष्याचं काय?' असा सवाल करतेय. त्यात नेटाने पुढे आलेल्या आणि आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या स्वीडनच्या युवा पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग (१६ वर्ष) ! यांच्या आधी अलेक्झांड्रिया व्हिलासोर (१४ वर्ष),  इसरा हिरसी (१६ वर्ष), झिये बस्तीदा (१७ वर्ष), विक बॅरेट (२० वर्ष), केटी एडर (१९ वर्ष) यांसारख्या तरुण कार्यकर्त्यांनी जोमाने आंतरराष्ट्रीय हवामान परिषदांमध्ये आपले विचार, सवाल उपस्थित केले.

'फ्राइडेस फॉर फ्युचर' हा उपक्रम गाजवणाऱ्या ग्रेटा थनबर्ग यांचा मागील वर्षाच्या (२०१८) ऑगस्टपासून दर आठवड्याला शुक्रवारच्या दिवशीचा हवामान किंवा भविष्यासाठी शाळेचा संप जगभरात प्रसिद्ध झालेला आहे. दर शुक्रवारी स्वीडिशची राजधानी स्टॉकहोम येथे संसदेच्या बाहेर बॅनर ठेवले जाते. या माध्यमातून नेते सामान्य लोकांना जगजीवन वाचविण्याचे आवाहन केले जाते.

संयुक्त राष्ट्र हवामान चर्चेत (सीओपी २५-माद्रिद,स्पेन) 'व्यवसाय क्षेत्र आणि राजकारणातील नेते हवामानाच्या मुद्द्यावरून लोकांची दिशाभूल करत आहेत', असा आरोप ग्रेटा थनबर्ग यांनी राजकारण्यांवर लावला तर 'मतभेद बाजूला ठेवा, एकत्रित या आणि हवामान बदलाच्या संकटावर मात करा', असे भाष्य भारतातील मणिपूरची लिसिप्रिया कांगुजाम ( वर्ष) हिने केले.

या तरुणांना जीवनाबद्दलची जाण आपल्या उमद्या वयातंच होतेय हेच खूप सुखावणारे आहे. प्रश्न करण्याची आणि तेही थेट विचारपूर्वक, योग्य वेळी, योग्य ठिकाणी भिडण्याची हिंमत खरंच अभिमानास पात्र आहे. आज देशाचा 'जागृत शाश्वत वारसा' चालवण्यासाठी तरुण नेतृत्वाची गरज भासत असतांना अशा जागृत प्रश्नांमुळे नक्कीच उज्ज्वल भविष्याची वाट देशांना गवसेल याचं जिवंत रूप पाहायला मिळतंय.

'पर्यावरणाचे रक्षण करा, जीवन अधिक सुखकर करा', असे कित्येक महानांचे कर्तव्यब्रीद आज तरुण पिढी आपले आद्य कर्तव्य म्हणून उचलून धरतेय. या मागची त्यांची तळमळ अनेकांनी वाचून, बोलून दाखवली. त्यांचे प्रश्न अनेकांना रास्त वाटले या पेक्षा दुसरे समाधान नाही. या निमित्ताने कुठूनतरी सुरुवात होताना दिसतेय. ही सकारात्मक बाब भविष्यात अशा अनेक तरुण पर्यावणवाद्यांच्या तसेच नेतृत्वगुण असणाऱ्या नेत्यांच्या, राजकारण्यांच्या, जागृत नागरिकांच्या जन्मास कारणीभूत ठरेल. ज्यामुळे हवामान बदलांचे रोख बदलून 'स्वच्छ, शाश्वत, सुंदर वातावरण, हवामान आणि अर्थातच जीवन' आपण नक्कीच भविष्यात अनुभवू शकू.

"पंख फुटतात विचारांना
कवेत दिसतं भविष्य ज्यांना
उद्याचा प्रश्न आज डोळ्यात
कवडसे समाधानाचे जाणिवांत
हवामान बदलांचे सुटतील वांधे यातून"
  
- वर्षा शिदोरे, नाशिक